बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

आत्मभान



रविवारी रात्री पुण्यातील एका सुखवस्तु कुटुंबातील दहा वर्षाच्या मुलाने गळफ़ास लावून आत्महत्या केल्यानंतर खुप खळबळ माजली. काही चॅनेलवर मग बालकांच्या मानसिकतेचे विश्लेषण करणार्‍या चर्चाही रंगल्या. ज्या मुलाला जगण्याचे अर्थही उमगलेले नाहीत, त्याला आत्महत्या म्हणजे आपणच आपली हत्या करण्याचे सूचले तरी कसे? हा खरा गहन प्रश्न आहे. हाच आजच्या शहरी जीवनशैलीला भेडसावणारा प्रश्न आहे. कारण जगण्यातल्या समस्येपेक्षा कल्पनेतल्या समस्या असह्य बोजा बनल्या आहेत, त्यावर उहापोह होत असतो. पण जगणेच हरवत चालले आहे, त्याची कोणाला दखलही घ्यावीशी वाटू नये, याचेच वैषम्य वाटते. त्या मुलाला अशी जीवनयात्रा संपवण्याची बुद्धी व्हावीच कशाला? गॉगल वा कुठले महागडे जर्किन पालकांनी नाकारले, हे आत्महत्येचे पुरेसे कारण असू शकते का? असेल तरी गळफ़ास लावायची अक्कल त्या बालकाला आली कुठून? कोणी अशा कल्पना अजाण पोरांच्या मनात घुसवल्या आहेत? एका अनावर क्षणी मनाचा उद्रेक झाला, मग काहीतरी अमानुष करायच्या कल्पना किती अलगद माणसाच्या सुप्त मनात भरवल्या जातात. त्याचा विचारच होणार नसेल, तर यापेक्षा वेगळ्याची अपेक्षाच करता येणार नाही. या बालकाच्या आत्महत्येची मोठी बातमी झाली आणि त्याच कालखंडात शेकडोंनी शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांची गणना वा दखल फ़क्त संख्येतून होत असते. या आठवड्यात, महिन्यात किंवा वर्षात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी बातमी येते. जग किती विरोधाभासांनी सध्या भरकटले आहे ना? एका बाजूला कोणी तरी हाती हत्यार वा स्फ़ोटके घेऊन इतर निरपराधांचे हत्याकांड करतो आणि दुसरीकडे काही माणसे इतकी निराशेच्या गर्तेत लोटली गेली आहेत, की आपणच आपली हत्या करायला प्रवृत्त होतात. एक समाज म्हणून आपण त्याविषयी किती संवेदनशील असतो?
एका घरातल्या कुटुंबातल्या बालकाने गळफ़ास लावून घेणे किंवा कुठल्या गावातल्या शेतकर्‍याने पीक बुडाले वा कर्जबाजारीपणाच्या बोजाखाली दबून आपलीच हत्या करणे, याचे आपल्याला काहीच वाटत नाही काय? अशा प्रत्येक गोष्टीसाठी सरकार नावाच्या वस्तु वा यंत्रणेवर आपण विसंबून असतो. बाकी त्या घटनांशी आपल्याला काहीच कर्तव्य उरलेले नाही. जोपर्यंत अशी आत्महत्या किंवा हत्याकांड आपल्या कुणा निकटवर्तियाचा बळी घेत नाही, तोपर्यंत आपण किती अलिप्त वा तटस्थ असतो ना? एक बातमी ऐकायची, वाचायची आणि सुस्कारा सोडून पुढल्या कामाला लागायचे. ही आपली माणुसकीची व्याख्या बनलेली आहे ना? अर्थात, कोणी हत्या केली वा आत्महत्या केली, त्याला आपण कुठे जबाबदार असतो? आपण काही त्याला प्रोत्साहन दिलेले नसते. मग आपल्या मनात अपराधी भावना असायचे कारणच काय? पण ज्या अवस्थेतून ती व्यक्ती जात असेल, तशी आपल्यावर कधीच वेळ प्रसंग येणार नाही, याची तरी हमी कोण देऊ शकणार आहे? शेजारच्या वा दूरच्या घराला आग लागते, तेव्हा आपण धावतो. तेव्हाही आपल्या घराला आग लागलेली नसतेच आणि आपण त्याला कुठल्याही प्रकारे जबाबदार नसतो. मग अस्वस्थ कशाला होतो? धावतो तरी कशाला? ती आग आपल्यापर्यंत पोहोचू नये, हीच त्यातली सावध इच्छा असते ना? मग त्या शेतकर्‍याची वा बालकाची आत्महत्या तरी त्यापेक्षा किती वेगळी असते? तेच संकट तसेच्या तसे आपल्यापर्यंत येऊ नये, यासाठी तितकेच सावध व संवेदनशील असायला नको काय?
असा प्रश्न विचारला, मग उत्तर सोपे असते. आम्ही सामान्य माणसे काय करणार? आमच्या हाती आहेच काय? इच्छा असेल व आस्था असेल तर आपल्या हाती खुप काही असते आणि करताही खुप काही येते. गुरू सावंत आणि अमृत श्रोत्री हे असेच दोन पुण्यातले तरूण आहेत. ज्यांना त्या आस्थेने अस्वस्थ करून सोडले. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करून तो वारसा जपण्यासाठी धडपडणार्‍या ‘परंपरा’ नामक संस्थेचे हे दोन कार्यकर्ते. आत्महत्येच्या सत्राने त्यांना अस्वस्थ करून सोडले. पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या थोपवण्यासाठी ते काय करू शकणार होते? इतर कोणाच्याही अगतिकतेपेक्षा त्यांची निराशा वेगळी नव्हती. पण काहीतरी करायला हवे अशा विचारांनी अस्वस्थ होऊन त्यांनी हालचाली सुरू केल्या. त्यातून एक कल्पना पुढे आली. आत्महत्येपासून माणसाला परावृत्त करण्याची ही कल्पना, त्यांनीच आणली आहे. पण हे साधायचे कसे? कोणी व कोणत्या मार्गाने आत्महत्या थोपवायच्या? कदाचित तसेच काही इतर लाखो हजारोंच्या मनातही असेल, पण कसे? कोणत्या मार्गाने? कोणी? अशा प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. त्यांच्यापुढे प्रत्येक माणुस हतबल होत असतो आणि मग ते काम सरकारचे अशी पळवाट शोधून आपल्या कामाला लागतो. पण अशा प्रश्नांची उत्तरे शोधली व सापडली, तर आपल्यातले कितीतरी लोक त्यासाठी उत्साहाने पुढाकार घेतील. कदाचित अनेकांच्या मनात त्यांची उत्तरेही असू शकतील. कालपरवाच एका माकडाला रेल्वेच्या ओव्हरहेड वायरने शॉक बसला आणि ते निपचित पडल्यावर त्याच्या अजाण सहकार्‍याने झुंज देऊन त्याला शुद्धीवर आणले, असे चित्रण अनेक वाहिन्यांनी दाखवले. आपण माणसे त्या पशूपेक्षा नक्कीच बुद्धीमान प्राणी आहोत. मग त्याच्याइतकी जिद्द आपल्यात नसेल काय?
अशा विषयात काय काय करता येईल? आपण काय करू शकतो? इतर लोक कुठल्या मार्गाने त्यात सहभागी होऊ शकतील? आत्महत्या होण्यापुर्वी अशा निराशाग्रस्त व्यक्तीपर्यंत कसे पोहोचता येईल? शेकडो प्रश्न आहेत आणि त्याची वेगवेगळी उत्तरे प्रत्येकापाशी असु शकतील. त्याची चाचपणी करण्याचा हा प्रयास आहे. त्यात पुढले काही पाऊल उचलण्यापुर्वी सुचना व प्रस्ताव मागवण्यासाठी ही पोस्ट. त्याच दिशेने उहापोह व चर्चा व्हावी म्हणून हा ‘आत्मभान’ समुह स्थापन करीत आहे. ज्यांना त्याविषयी आत्मियता असेल त्यांनी लाईक करावे, सुचना द्याव्यात, शेअर करावे, सदस्य जोडावेत. सर्वांचे स्वागत आहे.
गुरू सावंत 8007778433
अमृत श्रोत्री 7507029299

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा