रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

भिवंडीचे गांगुर्डे आणि जगताप आठवतात कुणाला?


    काही गोष्टी दिसत असतात, पण आपण बघायला तयार नसतो किंवा आपले ‘सरावलेले’ डोळे ते बघायला राजी नसतात. आणि समजा डोळ्यांनी बघितलेच तर व्यवहारी मेंदू ते स्विकारायला तयार होत नाही. कुठल्याही शहाण्या माणसाची अशी दुर्दशा असते. तुलनेने सामान्य किंवा अगदी अडाणी माणूस अधिक जागरुक असतो. त्याला सत्य स्विकारायला वेळ लागत नाही. तेवढेच नाही तर सत्य स्विकारून त्यानुसार प्रतिसादही द्यायला सामान्य माणूस वेळ लावत नाही. म्हणूनच जगाच्या इतिहासात नेहमीच शहाणे हात टेकतात; तेव्हा सामान्य माणसाने जग वाचवले आहे. चटकन हा मोठाच विरोधाभास वाटेल. पण जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सत्यापर्यंत पोहोचणे अशक्य अजिबात नाही. गेल्या शनिवारी मुंबईत अकस्मात जी दंगल झाली, ती तशी पहिलीच घटना नाही आणि मुंबई महाराष्ट्रात तर नाहीच नाही. अवघ्या सहा वर्षापुर्वी अशीच नेमकी घटना मुंबईपासून जवळच असलेल्या भिवंडी शहरात घडली होती. किंबहूना घडवली होती म्हणणे रास्त ठरवे. कसा योगायोग आहे बघा, तेव्हाही आपले शेपट्या पिरगाळण्याचे कौशल्य प्राप्त करून मगच राजकारणात उतरलेले आबा पाटिलच महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. आणखी एक मोठाच योगायोग आहे. तेव्हाची नेमकी तशीच घटना घडवणारी मुस्लिम संघटना सुद्धा तीच रझा अकादमीच होती. काही आठवते का? मी तुम्हा वाचकांना हा प्रश्न विचारलेला नाही; तर या महाराष्ट्रामध्ये जे स्वत:ला मोठे जाणकार, विश्लेषक किंवा राज्यकर्ते म्हणवतात, त्यांना विचारलेला हा प्रश्न आहे. त्यापैकी कोणाला २००६ सालातली भिवंडी आठवते का? तिथे काय व कशासाठी घडले होते ते तरी आठाते का?

   रमेश जगताप आणि बालासाहेब गांगुर्डे ही नावे ओळखीची वाटतात कुणाला? तुमची आमची गोष्ट सोडून द्या. पण ज्यांच्या हाती तेव्हा व आज पोलिस खात्याचा कारभार आहे, त्या आबा पाटलांना तरी ती नावे आठवतात काय? कारण ती कुठली रेशनकार्डवरची खाडाखोड केलेली नावे नाहीत, की मतदार यादीतली नावे नाहीत. ते दोघे पोलिस होते. एक बाळासाहेब गांगुर्डे हा भिवंडी भोईवाडा पोलिस ठाण्यातला शिपाई होता, तर रमेश जगताप हा नारपोली ठाण्यातला जमादार म्हणजे हेड कॉन्स्टेबल होता. ते दोघे ५ जुलै २००६ च्या रात्री गस्त करायला निघालेले होते. मोटरसायकल घेऊन जाताना त्यांना मुस्लिम जमावाने वंजारपट्टी भागातील बागे फ़िरदोस मशीदीजवळ अडवले. त्यांना खाली पाडण्यात आले आणि दगडांनी तलवारीने त्यांच्यावर जमाव तुटून पडला, त्यात दोघे ठार झाले. तिथेच आधीपासून बंद पाडलेल्या व फ़ोडलेल्या एसटी बसमध्ये मग त्यांचे मृतदेह फ़ेकण्य़ात आले. त्यानंतर त्या बसला आग लावण्यात आली. त्यात हे दोघे पोलिस शिपाई जळू्न भस्मसात झाले. त्यांची नावे तरी आज कोणाला आठवतात काय? सहा वर्षात त्यांना विसरून जाणे स्वाभाविकच आहे. कारण सेक्युलर राज्यात अशा पोलिस व सुरक्षा रक्षकांनी किडामुंगीप्रमाणे मरायचेच असते. किंबहूना त्यासाठीच त्यांनी जन्म घेतलेला असतो. ते काही टीव्ही, वाहिन्यांवरल्या चर्चेत भाग घेऊन किंवा खर्डेघाशी करून सेक्युलर किर्तन करायला जन्माला येत नसतात ना? जे कोणी अशी पुराणातली वांगी, चर्चा किंवा लिखाणातून सांगत असतात, त्या वांग्याचे भरीत होण्यासाठी व त्यासाठी स्वत:ला भाजून घेण्यासाठीच जगताप- गांगुर्डे जन्म घेत असतात ना? मग अशा मेलेल्या वांग्यांची नावे सेक्युलर पोपटपंची करणार्‍या शहाण्यांना किंवा सत्तेची खुर्ची उबवत आपल्या शेपट्या जपणार्‍या आबांना कशाला लक्षात रहातील? त्यांचे असे भाजून कोणी भरीत करून आपल्या सेक्युलर पंक्तीत तंदूर म्हणुन कोणी वाढले, त्याचे तरी स्मरण सेकुलर ढेकर देणार्‍यांना कशाला राहिल?

   पण माझी त्या सर्वांना विनंती आहे. त्या जगताप किंवा गांगुर्डेच्या हौतात्म्यासाठी नाही, तरी स्वत:चे असे तंदूर भरीत होऊ नये म्हणून तरी त्यांच्या आकस्मिक हत्या व मरणाची कारणे तपासून बघा. ती बघितली नाहीत म्हणुन मग अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर किंवा तुकाराम ओंबळे यांना आपले प्राण पणास लावायची वेळ आली होती. आणि आता शनिवार ११ ऑगस्ट २०१२ रोजी जे मुंबईत आझाद मैदान परिसरात झाले, तेही त्याच निष्काळजीपणामुळे. कारण जे घडले ते होणारच होते. कारण तसे घडणार याची पुर्वसूचना देण्यात आली होती. ती पुर्वसूचना पोलिसांच्या गुप्तचर विभागाने देण्याची गरज नव्हती; की केंद्राच्या गुप्तचर खात्याकडून येण्याचीही आवश्यकता नव्हती. जेव्हा या मेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली; तेव्हा ती कोण मागते यावरूनच पुढला घटनक्रम पोलिस व गृहखात्याच्या लक्षात यायला हवा होता. पण तो लक्षात आला नाही. कारण सहा वर्षापुर्वी भिवंडीत काय घडले त्याची दखल गृहमंत्री म्हणुन ना आबा पाटलांनी घेतली; ना मुंबई पोलिसांनी घेतली. खरे सांगायचे तर त्या काळात मी इथे नव्हतोच. म्हणजे मुंबईत सोडाच इथे भारतातही नव्हतो. तर दूर तिकडे अमेरिकेत सोळा हजार मैलावर होतो. पण जेव्हा भिवंडीची ती घटना मला इंटरनेटवर वाचायला मिळाली तेव्हाच मला शंका आली होती. ती सामन्य किंवा साधीसुधी घटना नव्हती. त्यामागे एक अनाकलनिय रहस्य होते. आणि म्हणुनच मी तिथे बसून पुढल्या काही दिवसात मोठा घातपात होण्याची शक्यता वर्तवली होती. दुर्दैवाची गोष्ट अशी, की असे मी लिहिले आणि इथे पाठवले सुद्धा. पण ज्यांच्याकडे पाठवले त्यांना ते चिथावणीखोर लिखाण वाटले आणि त्यांनी त्याला प्रसिद्धी दिली नाही. त्या दैनिकात लगेच तो लेख छापला गेला असता, तर अवघ्या बारा तासात माझी भविष्यवाणी खरी ठरली असती आणि त्याचे श्रेय त्याच दैनिकाला मिळाले असते. पण ते होणे नव्हते. कारण सेक्युलर दडपणाखाली त्यांनी तो लेख छापला नाही. आणि नंतर मात्र पस्तावले.

   मी ती भविष्यवाणी करायला कोणी ज्योतिषी नव्हतो. मी दिसणारे सत्य डोळसपणे पाहू शकतो आणि त्यानुसार तर्कशुद्ध लिहू शकतो. त्यात माझ्या विचार वा आवडीनिवडींना लुडबुड करू देत नाही. म्हणुनच मी गांगुर्डे आणि जगताप यांच्या हत्येमागचे षडयंत्र बघू शकलो होतो, जे अन्य सेक्युलर विचारांनी आंधळे झालेल्यांना दिसत असूनही बघता आले नाही. मी नुसते पाहिलेच नाही, तर त्यानंतरच्या दोन घटनांनी मला शंकाकुल बनवले आणि मी त्यामागचे दडलेले सत्य शोधण्याचा इतक्या दूर बसून प्रयत्न केला. पण जे त्यावेळी मुंबईत आणि अगदी भिवंडीपासून जवळ होते, त्या शहाण्यांना समोर दिसणारे सत्य बघताही आले नाही. किंबहूना दिसतही असेल, पण बघायची हिंमत झाली नसेल त्यांना. म्हणुनच पुढचा भीषण घटनाक्रम घडत गेला. त्यातून काही शिकता आले नाही म्हणुन मग सव्वा दोन वर्षात, आणखी तेवढाच भयंकर भीषण घटनाक्रम घडला. मी इतक्या दूर बसून काय बघत होतो? भिवंडीत जे घडले तेव्हा जुलै २००६ मध्ये ते आपोआप घडले नव्हते; तर मुद्दाम घडवण्य़ात आले होते. ज्याला खाजवून खरूज काढणे म्हणतात, त्यातलाच तो प्रकार होता. म्हणुनच मला त्यामागे काही कारस्थान असल्याची शंका आलेली होती. तिथे रझा अकादमीने मोर्चा किंवा मेळावा काढण्याचे कुठलेही रास्त कारण नव्हते. तरीही त्यांनी तो उद्योग केला होता.

   भिवंडीत कशाला मुस्लिम रस्त्यावर उतरून तेव्हा इतकी दंगल करत होते? तिथल्या कबरस्तानाच्या एका बाजूला पोलिस ठाणे बांधण्याचे काम सुरू होते. त्यावर आक्षेप घेतला गेला होता. त्यावर अगदी कोर्टबाजी झाली होती. ज्या जागेवर पोलिस ठाणे बांधले जात होते; ती सरकारी जमीन होती. पण ती कबरस्थानचीच जमीन आहे असा दावा करून कोर्टाकडे धाव घेण्यात आली होती. तिथे तो दावा फ़ेटाळून लावल्यावर प्रश्नच निकालात निघाला होता. त्यानंतरच बांधकाम सुरू झाले होते. मग निषेधाची गरज काय उरली होती? पण तरीही रझा अकादमीमे तो मेळावा मोर्चा योजला होता. त्यातुन परिस्थिती बिघडली आणि गोळीबार करण्याची वेळ आली. मग दंगल सुरू करून थेट पोलिसांनाच लक्ष्य बनवण्यात आले होते. त्यातच जगताप व गांगुर्डे यांची आहुती पडली होती. म्हणजे बळी घेतला होता. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, की रझा अकादमी ही सामाजिक संस्था नसून थेट सरकारी अंमलदार व प्रशासकिय यंत्रणेवर प्राणघातक हल्ला करणारी संघटना असल्याचा इतिहास ताजा आहे. मग अशा संस्थेने मुंबईत आझाद मैदानावर कुठल्याही कारणास्तव मोर्चा मेळावा घ्यायचे ठरवले, तर दंगल होणार आणि त्यात पोलिसांवर हल्ला होणार; ही सुर्यप्रकाशा इतकी स्पष्ट गोष्ट होती. हे (ज्यांच्या जीवावर बेतले त्या जगताप व गांगुर्डे यांचे सहकारी व समव्यवसायी असलेल्या) पोलिसांना कुठल्या गुप्तचर यंत्रणेने सांगायची गरज होती काय? काय झाले होते भिवंडीच्या दंगलीनंतर?           ( क्रमश:)
भाग  ( ५ )     २०/८/१२

२ टिप्पण्या: